गोसासीमध्ये खंडणीसाठी हॉटेल मालकावर गोळीबार   

राजगुरूनगर : (वार्ताहर ) : गोसासी (ता. खेड ) येथे हॉटेल चालकावर एकाने गावठी पिस्तुलातून दोनदा गोळीबार केला. परंतु नेम चुकवला म्हणून दुर्घटना टळली. मात्र टोळक्याकडून लाथा, बुक्क्यांनी मारहाण करत हॉटेल चालकाच्या भावाला बेदम मारहाण केली. ’हॉटेलचा चांगला धंदा होतोय, आम्हाला हप्ता चालु कर’ असे म्हणत त्यांनी दहशत निर्माण केली.
 
हॉटेलसमोर असलेल्या दुचाकीं, मोटारींची तोडफोड केली. खेड तालुक्याच्या पुर्व भागात गोसासी येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या याप्रकरणात खेड पोलिसांनी नऊ जणांविरोधात खंडणी, बेकायदा जमाव जमा करून दहशत, मारहाण तसेच बेकायदा शस्त्र बाळगुन जीवितास धोका पोहचविण्याच्या हेतुने गोळीबार असा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली. मयुर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश दौंडकर (तिघे रा. कन्हेरसर, ता. खेड), गणेश दिलीप गोरडे, (रा. गोसासी, ता. खेड), बंटी डफळ (रा. धामारी, ता. शिरूर) यांसह इतर चार अनोळखी युवकांचा त्यात समावेश आहे. हॉटेल चालक निलेश रोहिदास गोरडे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
याबाबत पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले, शनिवारी सबंधित हॉटेलमध्ये संशयीत आरोपींनी जेवण केले. बिलाचे पैसे मागितल्यावर अक्षय हजारे याने कमरेचा पट्टा काढून मालक निलेश याला मारण्याची धमकी दिली. हा वाद मिटल्यावर काही वेळाने म्हणजे हॉटेल बंद झाल्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हे टोळके पुन्हा हॉटेल समोर आले. त्यांनी हॉटेल चालक आणि त्यांच्या भावांना शिवीगाळ केली.टोळक्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये संदेश गोरडे यांना मारहाण करून जखमी केले. त्यानंतर या सर्वांनी दगड, लाकडी दांडके, पार्किंगमधील कुंड्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या मोटार व दुचाकींच्या काचा तसेच हॉटेलच्या काचा, फ्लेक्स बोर्ड फोडुन त्यांचे नुकसान केले.
 
गोसासी गाव खेड सिटी या एसईझेड कारखानदारी असलेल्या भागात आहे. कंपनी क्षेत्रात यापूर्वीही टोळक्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दहशत निर्माण केली आहे. कंपनीत काम मिळावे यासाठी, स्क्रॅप उचलण्यासाठी येथे खून, मारामार्‍या प्रकरणे यापुर्वी समोर आली आहेत. कायम होणार्‍या दादागिरी, दहशतीच्या घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. कारखानदारी वाढत असलेल्या या भागात कायमस्वरुपी पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles